मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, ८ फेब्रुवारी २०२६

घराच्या चार भिंती या त्या घरात राहणार्‍या कुटुंबासाठी एक सुरक्षित निवारा असतो. आपलं घर हा आपला कम्फर्ट झोन असतो. पण जर घरातली एखादा सदस्यच असुरक्षित असेल तर ते घर गुन्हा घडण्यासाठी एका घटनास्थळी पेक्षा कमी नाही.
हा मुद्दा चर्चेत आला त्याला कारण, नवी मुंबई पोलीसांच्या वार्षिक गुन्हे अहवालातून समोर आलेली आकडेवारी. या आकडेवारीवरून काही घरात महिला घरातच सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गतवर्षी बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये २३५ पैकी २१४ गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तीकडून घडले आहेत. यातील १७ गुन्हे हे कुटुंबातल्या व्यक्तीविरोधातच आहे. तर ४ गुन्हे हे अनोळखी व्यक्तींविरोधातले आहेत.

Click : बुद्धिमत्तेवर विश्वास हवा

विनयभंगाच्या २३५ गुन्ह्यांमध्ये देखील ओळखीच्या व्यक्तींकडून १३९, कुटुंबातून १५, ऑनलाइन २३ तर अनोळखी व्यक्तीकडून २९ गुन्हे घडले आहेत. याची कारणं नक्कीच वेगवेगळी असणार आहेत. घराच्या आत महिला, मुलींना ज्या हिंसेला तोंड द्यावे लागते त्याबद्दल आता काही प्रमाणात बोललं जात आहे. पण अशी अनेक घर असतील जिथल्या महिला, मुली केवळ सहन करत आहेत. कोणत्याही सामाजिक स्तरातल्या असो किंवा शैक्षणिक पात्रतेच्या असो त्या केवळ अन्याय सहन करत आहेत. आपलं म्हणणं ऐकूनच घेतलं जाणार नाही किंवा घरातून बाहेर काढलं तर जायचं कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. दरवेळी कोणी महिला आश्रम किंवा आईवडीलांकडे जात नाहीत. या सर्वात नात्यातल्या लोकांकडून होणारा त्रास सहन करतात. तर काहींना हेल्पलाईनचा आधार वाटतो.

Click : ‘स्वीकृत’साठी ज्येष्ठांमध्ये रस्सीखेच, नव्यांना संधी ?

मुलांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध हेल्पलाईन, क्रमांक जारी केल्यानंतर आपल्यावरचा अन्याय ते सांगू शकत आहेत. पौगंडावस्थेतील मुलं, मुली यांचा घरातल्या व्यक्तींवर विश्वास असतो. त्यामुळे त्याच्याकडून आपल्याला काही वेगळी वागणूक मिळतेय हे त्यांना समजायलाच वेळ लागतो. जेव्हा ते समजतं तेव्हा मात्र मानसिक खच्चीकरणासाठी जास्त होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र आई वडिलांची भक्कम साथ गरजेची असते. उंबरठ्याच्या आतलं जग सुरक्षित नसेल तर मुली, महिलांवर होणारा मानसिक आघात किती मोठा असेल. सुशिक्षित घरात अनेकदा महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो.

Click : तिसऱ्या मुंबईच्या गोंडस नावाखाली भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर : हर्षवर्धन सपकाळ

कायद्याच्या धाकाने शारीरिक त्रास फारसा दिला जात नसेल पण सतत दिला जाणारा मानसिक त्रास तिला उध्वस्त करतो. कधीतरी एखादी विवाहिता याबद्दल पोलिसांत तक्रार करण्याचं धाडस दाखवते. मात्र अशा कितीतरी महिला असतील ज्यांना यासाठी समोर येता येत नाही. त्यांना कायद्यावर विश्वास ठेवून कायद्याने लढायची ताकद मिळते हा मोठा दिलासा आहे.
मुली, महिला यांच्या समस्या वेगळ्या असल्या तरी कुटुंबातील व्यक्तिने दिलेला त्रास हा मनावर होणारा आघात असतो. आता हातातल्या फोनमधून सर्वांनाच कायदे समजतात त्याचा गैरवापर करून कुटुंबांच्या विरोधातही तक्रारी दाखल होतात ही देखील बाजू नजरेआड करता येणार नाही.

Click :दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नात्यातल्या व्यक्ती या दरवेळी मुली, महिला यांच्याकडे आपल्याच घरातला सदस्य म्हणून पाहतील असं नाही.
त्यामुळे बलात्कार, विनयभंग सारख्या घटनांमध्ये नात्यातल्या व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पिडीतेच्या आई वडिलांना खंबीर भूमिका घ्यावी लागते. त्यासाठी करावा लागणारा संघर्ष मानसिक कसोटी पाहणारा ठरतो. अशा गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो वेळेत सुनावणी व्हावी आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळावी एवढीच त्या पिडीतेची इच्छा असते. पण कोर्टात केस उभी राहण्यासाठी लागणारा वेळ हा प्रचंड मोठा कालावधी असतो. तोपर्यंत आरोपी मोकळा फिरतो आणि पिडीता मात्र भीतीच्या सावटाखाली वावरत असते. हे गुन्हे सिध्द होण्यासाठी लागणारा वेळ कमी करता आला आणि आरोपींना कडक शिक्षा झाली तरच तिने दाखवलेल्या धैर्याला सन्मान मिळेल.

आताची कौटुंबिक परिस्थिती ही चौकोनी झाली आहे. घरात एकत्र असलेल्या सदस्यांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही. सोशल नेटवर्किंग साईटवर शेकड्यांनी मित्र, फॉलोअर्स मात्र घरात संवाद नाही. मुलांनी सांगीतलं आई वडिल ऐकत नाहीत. आई वडीलांचं मुलं ऐकत नाहीत. या परिस्थितीमुळेही दुरावा वाढतोय आणि मग एखादीघटना घडली तर घरातले विश्वास ठेवायला तयार होत नाहीत ज्याचा जबर आघात पिडीत मुलांवर होतो. मुलांचा बराचसा वेळ हा शाळा, महाविद्यालय जातो. तिथे कुटुंबपातळीवर संवाद, मुलांना चांगला-स्पर्श व वाईट-स्पर्श याची माहिती, तसंच संशयास्पद वर्तन याबाबत जनजागृती केली जाणं जास्त गरजेचं आहे.

मुलांचं म्हणणं मग ती लग्न झालेली विवाहिताही असो एखाद्या बद्दलची तक्रार ही गांभीर्याने ऐकणं आणि संशयास्पद वर्तनाकडे दुर्लक्ष न करणं ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. कायद्याच्या पातळीवर महिलांसाठी आणि बालकांसाठी कठोर तरतुदी अस्तित्वात आहेत. पॉक्सो कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिला संरक्षण कायदे त्यासाठी पाठिशी आहेत गरज आहे ती फक्त पिडीतांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची.

========================================================

========================================================