भारत आणि सर्बिया संबंधांचे नवे पर्व

दोन्ही देशांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी लवकरच कृती आराखडा
सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांची माहिती
मुंबई,13 जानेवारी 2017/AV News Bureau :
भारत आणि सर्बिया देशांचे संबंध आणखी दृढ करताना दोन्ही देशांत उद्योग-व्यापार वाढीसाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाईल, असे सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी गुरुवारी सांगितले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे पंतप्रधान वुसिक यांच्याहस्ते “बेल रिंगिंग सिरेमनी” संपन्न होऊन मार्केटचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भारत आणि सर्बिया देशाचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून दोन्ही देशांत उद्योग-व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यासाठी कृती आराखड्याद्वारे भरीव प्रयत्न केले जातील. त्याद्वारे दोन्ही देशाचे जुने नाते अधिक सुदृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र, गुजरातसारखी राज्ये सर्बियासाठी उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची राज्ये आहेत. भारतीय उद्योजकांचे सर्बियामध्ये हार्दिक स्वागत आहे. परस्पर समन्वय, सहकार्य आणि सुसंवादातून भविष्यात दोन्ही देश एकत्र येऊन उत्तम काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विश्वातील सर्वात मोठ्या मार्केटचा, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आजच्या दिवसाचा शुभारंभ रिंगिग बेल सोहळ्याद्वारे करता आला, याबद्दल विशेष आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.