पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या

15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी निवडणूक

मुंबई,15 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान  होणार आहे. 2 हजार 567 जागांकरिता 11 हजार 989 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

राज्य निवडणूक आयोगाने 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांचा; तर दुसऱ्या टप्प्यांत 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 8 पंचायत समित्या व त्यांअतर्गतच्या निवडणूक विभागांचा पहिल्या; तर 4 पंचायत समित्या व त्यांतर्गतच्या निवडणूक विभागांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. सर्व निवडणुकांची मतमोजणी  23 फेब्रुवारी  होणार असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

  • पहिला टप्पा

15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जिल्हा परिषदांतर्गत 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

  • मतदार

2 कोटी 4 लाख 4 हजार 300 मतदार असून त्यापैकी 1 कोटी 7 लाख 79 हजार 726 पुरुष, 96 लाख 24 हजार 479 महिला; तर 95 इतर मतदारांचा समावेश आहे.

  • मतदान केंद्र

24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने 72 हजार 93 बॅलेट युनिट आणि 48 हजार 62 कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या सर्वांसाठी 1 लाख 58 हजार 604 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्या

जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतचे निवडणूक विभाग.

  • मतदानाची वेळ

मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.