दलितमित्रांना दरमहा दहा हजार पेन्शन द्या

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तीला शासनाकडून एसटीचा मोफत पास दिला जातो या मोफत पाससोबतच त्यांना दरमहा 10 हजार रूपये पेन्शन द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सरकारकडे केली आहे.

अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरिक व मानसिक दृष्टया अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसह तसेच सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला जातो त्यांना एसटीचा मोफत पास दिला जातो. यासोबतच पुरस्कार प्राप्त दलितमित्रांना दरमहा 10 हजार रूपये पेन्शन सरकारने सुरु करावी. ज्यामुळे पुरस्कार प्राप्त दलितमित्रांना सामाजिक कार्यात आर्थिक अडचण भासणार नाही असे डॉ.वाघमारे यांनी स्पष्ट केले.