शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या रकमेतून कर्जवसूली थांबवा

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मुंबई,3० मार्च 2017 /AV News Bureau :

पिकविम्याच्या रकमेतून बेकायदा कर्जवसुली केल्याने विम्याचा उद्देशच सफल होत नाही. त्यामुळे शासनाने कर्जवसुलीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.

शेतकऱ्यांना पिकविम्याच्या भरापाईपोटी मिळणाऱ्या रकमेतून कर्जवसुलीची रक्कम कापून घेण्याचे आदेश सहकार विभागाने बँकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील नवीन आदेश 22 मार्च रोजी काढण्यात आला आहे. हा मुद्दा विधान परिषदेत विशेष बाब म्हणून उपस्थित करताना मुंडे यांनी बँकांनी बेकायदा कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांनी विमा काढण्याचा उद्देश हा पिकांचे नुकसान झाल्यास अडचणीच्यावेळी आर्थिक मदत व्हावी,  असा असतो. परंतु, सरकार परस्पर कर्जवसूली करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलत असल्याचे मुंडे म्हणाले.