नांदगाव येथे दोन मुली बुडाल्या,दोघींना वाचविले

बोर्ली मांडला, 13 एप्रिल 2017 /AV News Bureau:

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या चौघींपैकी दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना आज मुरुड तालुक्यातील नांदगावमधील वाघेश्वर नगर येथे घडली. वाचविण्यात आलेल्या दोन मुलींवर स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुरूड तालुक्यातील मौजे नांदगाव येथील वाघेश्व्र्र नगर येथील आदिवासी वाडीवरील वाघोबा तलावात संजना दिलीप वाघमारे  (7) ,वैशाली शैलेस पवार( 8),दीपाली पिकेश वाघमारे (7) आणि जयश्री वाघमारे  (4) या मैत्रीणींसोबत शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघी पाण्यात बुडू लागल्या. त्यामुळे इतर मुलींनी गावातील लोकांना ओरडून सांगितले. ग्रामस्थांनी लगेचच तलावाकडे धाव घेत दीपाली वाघमारे आणि जयश्री वाघमारे या दोघींना पाण्याबाहेर काढले. तर संजना आणि वैशाली या खोल पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. याप्रकरणी शैलेस गणेश पवार  यांनी मुरूड पोलीस ठाण्यात माहिती दिली.

वाचविण्यात आलेल्या दीपाली वाघमारे आणि जयश्री वाघमारे ह्यांची प्रकुती गंभीर असल्याने त्याना तातडीने अलीबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने मुरुड परिसरात एकच शोककळा पसरली आहे.