विश्वास आणि विकासामुळे भाजपला यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, 27 एप्रिल 2017/AV News Bureau:

विश्वास व विकासाच्या मुद्द्यावर जनतेने भारतीय जनता पार्टीला महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भरघोस यश दिले आहे. या संस्थांमध्ये कारभार करताना पारदर्शिता व प्रामाणिकपणाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी – चिंचवड येथील बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे देशात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांमुळे राज्यातील जनतेचा विश्वास बळकट झाला. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील भाजपाचा विजय हा या विश्वास व विकासाचा विजय आहे हे भान हवे. या विजयातून अहंकार निर्माण होता कामा नये,असे फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा आणि जनतेचा प्रतिसाद नाही. सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली, तेच आता संघर्ष यात्रा काढत आहेत. शेतकऱ्यांची भाजपाकडून अपेक्षा आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी यात्रा काढावी आणि भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामाची माहिती त्यांना द्यावी,असे फडणवीस म्हणाले.