मनसेची पीडब्लूडी कार्यालयात तोडफोड

  • सायन पनवेल महामार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई,16 जुलै 2018:

सायन पनवेल महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे गेल्या दीड-दोन वर्षात १०३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. असे असताना सरकार व सार्वजनिक बांधकाम विभाग या खड्यांवर कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे आज अखेर नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली. याआधी निवेदन देऊन, खड्ड्यांमध्ये आंदोलन करून देखील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे आज हा खळखट्ट्याकचा मार्ग अवलंबल्याचे मनसेने म्हटले आहे. असंवेदनशील भाजप-सेना सरकारला कंत्राटदारांचे हित जपायचे असल्यामुळेच या खड्ड्यांबाबत अजून कोणत्याच कंत्राटदाराला अटक किंवा अभियंत्यांवर कारवाई झाली नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

13 जुलै रोजी सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे सनी विश्वकर्मा आणि कमलेश यादव या दोघांचा अंधारात खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये सनी विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जबर जखमी झाला. 5 जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. सायन पनवेल महामार्ग हा सामान्यांसाठी सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री व नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सदर अपघातांबाबत मंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे तसेच  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित रस्ते कंत्राटदारांना जबाबदार धरून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.

आंदोलनाच्यावेळी “खड्डे मुक्त सायन पनवेल हायवे… झालाच पाहिजे… झालाच पाहिजे !!”, “चंद्रकांत पाटील हाय हाय…हाय हाय !!”, “एकनाथ शिंदे हाय हाय…हाय हाय!!”, “प्रवीण पोटे हाय हाय….हाय हाय!!” या घोषणा देऊन मनसैनिकांनी PWD कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रामधून मुंबईला प्रवास करणाऱ्यांना हा २० ते २४ किलोमीटर लांबीचा सायन पनवेल महामार्ग सोयीचा आहे. मात्र आता या महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते वाशी हा प्रवास करण्यास तब्बल दोन तासांचा अवधी या खड्ड्यांमुळे लागत असल्याचे मनसेने म्हटले आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे महामार्ग पाहणी दौऱ्याची निव्वळ नौटंकी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

नवी मुंबई मनपाने बेलापूर ते वाशी हा १४ किलोमीटरचा रस्ता मनपाला हस्तांतरित करण्यात यावा म्हणून पत्र देऊन ही, सार्वजनिक बांधकाम विभागाने याला प्रतिसाद दिला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याची डागडुजी व देखभाल जमत नसेल तर मनपाकडे हा रस्ता डागडुजीसाठी दिली जावा. यासाठी मनपाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पैसे वर्ग करावेत, पण आर्थिक मलिदा खायला मिळणार नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते हे साध्य होऊन देत नाहीत. या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय केला नाही तर आज सारखेच उग्र आंदोलन मंत्रालयात करण्याचा इशारा मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.  ​

================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड