समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, १ डिसेंबर २०१९:

 मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून  महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केले.  

मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज झाले.

मंत्रिमंडळावर विश्वास केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, राज्यातील जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याची शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे.  हे राज्य साधु-संतांचे, वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. अशा राज्याचे नेतृत्व करताना मैदानातला माणूस असूनही प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण वैधानिक वातावरणात आलो असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर चार सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हता. सदस्य श्री. अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य सर्वश्री जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील सदस्य एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत यांचा परिचय करून दिला.

=========================================

अविरत वाटचाल पेपर

===========================================

इतर बातम्यांचाही मागोवा