राज्यातील पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 3 एप्रिल 2021:

महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागने घेतला असल्याची माहिती आज शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते त्यानुसार शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

इयत्ता पहिली ते आठवी च्या वार्षिक मूल्यमापनाच्या संदर्भात संवाद साधण्यासाठी एक विशेष संदेश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसारित केला आहे. त्यामध्ये कोविडच्या या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता  1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती दिली.

कोविड 19 मुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इ. 1 ली ते 4 थी च्या शाळा आपणास सुरु करता आल्या नाही व इ. 5 वी ते ८ वी च्या शाळा सुरू करता आल्या. . असे असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित “शाळा बंद…पण शिक्षण आहे” अशा स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिक्षण सुरू राहावे म्हणून प्रयत्न सुरू होते. त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे प्रयत्न केले गेले. गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा  या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री  वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे. तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत.

राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. १ ली ते इ. ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही.

इ. १ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील.

त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल अशीही माहिती या संदेशात दिली आहे.

——————————————————————————————————