दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विश्व मराठी संमेलन 2023चे थाटात उद्घाटन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई 4 जानेवारी 2023

“विश्व मराठी संमेलनास  राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे”.

शिंदे पुढे म्हणाले की, “जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक  आहे”.

मराठी ज्ञानभाषा व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

“जगातल्या सर्व मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे”, असे सांगून “जगातल्या विविध भाषांतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र मराठीतील साहित्य हे जगाच्या विविध भाषांत अनुवादित होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आयोजित संमेलनास उपस्थित राहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही – मंत्री दीपक केसरकर

“मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे”.”मुंबईतील मरीन लाइन्स येथे मराठी भाषा भवन होणार असून तेथे मराठी भाषा विभागाची सर्व कार्यालय एका छताखाली असणार आहोत, अशी माहिती श्री केसरकर यांनी यावेळी दिली .

प्रास्ताविक मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी केले तर राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.

=======================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र