ठोस मुद्दे नसल्यानेच पंचतारांकीत संघर्ष यात्रा

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांना टोला

पनवेल, 4 एप्रिल 2017/AV News Bureau:

जनतेच्या विकासासाठी सरकार तत्पर आहे. त्यामुळे या सरकारबाबत बोलण्यासाठी विरोधकांकडे एकही ठोस मुद्दा नसल्यामुळे त्यांना पंचतारांकीत संघर्ष यात्रा काढावी लागली, असा टोला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांना मारला.

विचुंबे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अमिता म्हात्रे, माजी सदस्य राम म्हात्रे आणि अन्य कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ठाकूर यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीका केली.

जनतेच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेहनत घेत आहेत. मात्र विरोधकांना समाजकारण आणि विकासापेक्षा राजकारण महत्वाचे वाटत आहे. त्यामुळेच विरोधकांकडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला.