नवी मुंबईत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्प राबविण्याची चाचपणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  3 नोव्हेंबर  2023

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तुर्भे एमआयडीसी परिसरात शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित असून हा पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावाजला जात आहे.

सन 2004 पर्यंत सुरुवातीच्या काळात सेक्टर 14 कोपरखैरणे येथील सिडकोच्या क्षेपणभूमीवर कचरा टाकला जात होता. तेव्हा नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत होत्या तसेच विविध स्तरांतून या क्षेपणभूमीला विरोध केला जात होता. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेत नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यायी जागा शोधण्यास सुरुवात केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात प्राप्त झालेल्या 36 एकर जागेमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2004 नुसार शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सन 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आला.

बातमी वाचा : ब्रह्मांडातल्या आवाजाचा शोध

जेएनएनयुआरएम अंतर्गत याठिकाणी प्रतीदिन 350 मेट्रीक टन क्षमतेचा खत प्रकल्प व औद्योगिक इंधन अर्थात आरडीएफ निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 लागू झाल्यानंतर यामध्ये अनुषांगिक बदल करण्यात येऊन या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली.

तुर्भे एमआयडीसी येथे हा आधुनिक शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विकसीत करताना जुनी कोपरखैरणे येथील क्षेपणभूमीही शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याची कार्यवाही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली व त्या जागेवर मोठया प्रमाणात हिरवळीची लागवड करीत निसर्गोदयान विकसीत करण्यात आले. आज या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी जॉगींगसाठी तसेच विरंगुळयासाठी 7 ते 8 हजारहून अधिक आबालवृध्द नागरिक दररोज येत असतात. तसेच निसर्गोद्यानाच्या कडेने या विस्तृत जागेवर 65 हजार देशी वृक्षरोपांची लागवड करून मियावाकी पध्दतीचे शहरी जंगल विकसित करण्यात आलेले आहे.

बातमी वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

अशाप्रकारे कोणत्याही प्रकल्पामध्ये व कामामध्ये पर्यावरणशीलता जपण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे एमआयडीसी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक अद्ययावत आणि आधुनिक तंत्रयुगाला साजेसा बनविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

सध्या काही मोठी शहरे शासन धोरणानुसार ओल्या कच-यापासून गॅस निर्मिती व विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्याची कार्यवाही करताना दिसत आहेत. केंद्र सरकारनेही देशातील तेल कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून कच-यापासून गॅस व विद्युत निर्मिती करणा-या पर्यावरणशील प्रकल्प उभारणीवर भर देत तशा प्रकारचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार बीपीसीएल, इंडीयन ऑईल, ओएनजीसी, गेल अशा कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून काही शहरांमध्ये कच-यापासून गॅस व विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली आहे.

बातमी वाचा : अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

      घनकचरा व्यवस्थापनात नेहमीच वेगवेगळ्या स्वरुपाचे अत्याधुनिक प्रयोग करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने देखील याविषयी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबईत कच-यापासून गॅस निर्मिती व विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्यास ओेएनजीसी सारखा मान्यताप्राप्त उद्योगसमुह उत्सुक असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सर्वांगीण विचार करुन चाचपणी करीत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनात अधिक सक्षम होणार आहे.

========================================================

========================================================