कॅन्सर फाउंडेशन आणि ज्यूपिटर डायकेम प्रा. लि.यांच्या विद्यमाने वोक्हार्ट हॉस्पीटल हेल्थकॅम्प आणि रक्तदान शिबीर

कॅन्सरचा इलाज लवकर होणे आवश्यक -केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 18 जानेवारी 2026

कॅन्सरसारख्या आजारावर मात करण्यासाठी त्यावर इलाज लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. इलाज वेळेत आणि लवकर झाल्यास त्याचा फायदा रूग्णाला होऊन त्यामधून रूग्णाला वाचवणे शक्य होते असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय आणि कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, कॅन्सर फाउंडेशन आणि संयुक्त ज्यूपिटर डायकेम यांच्या विद्यमाने कफ परेड, कुलाबा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे 17 जानेवारी रोजी वोक्हार्ट हॉस्पिटल हेल्थकॅम्प आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते.


आपल्या भाषणात त्यांनी वंचित समाजासाठी सुलभ आरोग्यसेवा महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी आरोग्य शिबीरातील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

क्लिक करा :  बुद्धिमत्तेवर विश्वास हवा
या आरोग्य शिबीरात रक्तदान शिबीर, नेत्र रोग आणि डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप आणि मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांची . रक्त तपासणी आणि रक्त गट चाचणी करण्यात आली. ई.सी.जी चाचणी आणि कॅन्सर आजाराची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबीराला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आरोग्य शिबीरातील चाचण्या आणि वैद्यकीय सल्ल्यांबाबत समाधान व्यक्त केले.


या आरोग्य शिबीराचा महत्वाचा टप्पा म्हणजे या उपक्रमाच्या मुख्य आयोजकांपैकी एक आरव चोखानी या इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांने पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले. शिबिराला उपस्थित असलेल्या नागरिकांना योग्य पोषण आहारासाठी रोजच्या आहारातील परवडणा-या उपायांची माहिती दिली. संतुलित आणि पौष्टिक आहार केवळ शारीरिक आणि बौध्दिक विकासासाठीच नाही, तर मुलांमधील आजार कमी करण्यासाठीही कसा महत्त्वपूर्ण ठरतो हे पटवून दिले.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पण परवडणा-या बाबींचा आहाराचा समावेश केला तर भविष्यातील दिर्घकालीन वैद्यकीय खर्च कसा कमी होऊ शकतो यावर आरव याने भर दिला. विशेषतः रोजच्या जगण्यात संघर्ष असणा-या कुटुंबांना कमी खर्चात योग्य आणि संपूर्ण संतुलित आहार कसा घेता येईल यावर आरव याने भर दिला जेणेकरून भविष्यात आरोग्याच्या तक्रारीवर होणारा भरमसाठ खर्च कसा कमी करता येईल याबाबत आपल्या सहज आणि ओघवत्या शब्दांत आरव याने उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

आहाराचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबद्दल अधिक जागरूक होण्यास या शिबिरामु़ळे प्रोत्साहन मिळाल्याची भावना लाभार्थीनी यावेळी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करणे आणि त्यांना सर्वांगीण पोषण व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबद्दल मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा उद्देश होता.


या शिबिराने पोषण आणि लवकर वैद्यकीय तपासणीबद्दल यशस्वीपणे जागरूकता निर्माण केली, जी केवळ व्यक्तींनाच मदत करत नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या बाबतीत दीर्घकालीन लवचिकता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

========================================================