दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या दिनामागील मुख्य उद्देश आहे.
सध्याच्या घडीला कर्करोग हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत असून, योग्य माहिती, आरोग्यदायी जीवनशैली आणि नियमित वैद्यकीय तपासणी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कर्करोग टाळता येऊ शकतात किंवा सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून यशस्वीपणे उपचार करता येतात. त्यामुळे कर्करोगाविषयी भीती न बाळगता जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.
कर्करोग होण्यामागील प्रमुख कारणे :
• तंबाखू व मद्यसेवन
• अस्वास्थ्यकर आहार व शारीरिक निष्क्रियता
• वाढता ताणतणाव
• पर्यावरणीय प्रदूषण
• काही आनुवंशिक कारणे
कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे उपाय :
• तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहणे
• संतुलित आहार व नियमित व्यायाम
• महिलांनी स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची नियमित तपासणी करणे
• पुरुषांनी तोंड व फुफ्फुस कर्करोग तपासणी करणे
• कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे
लक्षणे दुर्लक्षित करू नयेत :
• वजन अचानक कमी होणे
• वारंवार ताप येणे
• तोंडामध्ये दीर्घकाळ न बऱ्या होणाऱ्या फोडी
• सततचा खोकला किंवा आवाज बसणे
• अंगावर गाठी येणे
• असामान्य रक्तस्राव
ठाणे ग्रामीण भागात २०२५–२०२६ या कालावधीत मुख कर्करोगाचे २२, स्तन कर्करोगाचे १७ तर गर्भाशय कर्करोगाचे ३ रुग्ण निदानास आले असल्याची नोंद आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी आरोग्य तपासणीबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त सर्व नागरिकांनी तणावमुक्त, व्यसनमुक्त व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे, दैनंदिन व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.“कर्करोगाला घाबरू नका, योग्य माहिती आणि चांगल्या जीवनशैलीने त्याचा सामना करा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
कर्करोगाविषयीची भीती दूर करून सकारात्मक दृष्टिकोन, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यांद्वारे निरोगी जीवन शक्य आहे.
- रेश्मा सावित्री गंगाराम आरोटे
- जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
========================================================
















