मुंबई, 2 जानेवारी 2017/AV News Bureau:
राज्यात राबविण्यात येणाऱ्या व्हीपीएस (व्हिजिटींग पेडियाट्रिक सर्जन टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल) योजनेअंतर्गत आतापर्यंत साडेतेराशे बालकांवर विविधप्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि उपजिल्हा रूग्णालयात खासगी बालरोग शल्य चिकित्सकांची सेवा मिळण्यासोबतच बालरुग्णांवर योग्यप्रकारे आणि वेळेत शस्त्रक्रिया होण्यासाठी राज्य सरकारने व्हीपीएस योजनेला चालना दिली आहे.
या योजनेसाठी शासनास इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन (आयएपीएस) या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. देशात अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या योजनेमुळे गडचिरोली, चंद्रपूर यांसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील बालकांना मिळत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. बालरुग्णांना जीवनदान देणाऱ्या या ‘महाराष्ट्र मॉडेल’ची अंमलबजावणीदेशपातळीवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोग शल्य चिकित्सकांची कमतरता असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील बालकांवर आवश्यक शस्त्रक्रिया होण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः जन्मजात दोषांवर वेळीच उपचार न केल्याने या बालकांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे या बालकांचे बालपण चांगले जावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला.
खासगी बालरोग शल्य चिकित्सकांनी महिन्यातून एक किंवा दोनदा जिल्हा शासकीय रूग्णालयात भेट द्यावी आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) कार्य करणाऱ्या गटाने निवड केलेल्या बालकांवर आवश्यक ती शस्त्रक्रिया करावी अशी कल्पना मांडण्यात आली होती. त्याला बालरोग शल्य चिकित्सकांच्या आयएपीएस या संघटनेने त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला.
आयएपीएसचे 60 शल्य चिकित्सक या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांनी 22 जिल्ह्यांतील जिल्हा व उपजिल्हा अशा एकूण 35 रुग्णालयांत नियमित भेट देऊन बालकांवर शस्त्रक्रिया केली. डिसेंबर 2015 पासून या योजनेंतर्गत 1353 बालकांवर गळू, हाडांतील वाकडेपणा, हर्निया, तुटलेले ओठ अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राज्यातील रायगड, नाशिक, नंदुरबार,अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतीलबालरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापैकी उस्मानाबाद, चंद्रपूर,यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांत आरबीएसकेच्या गटाने निवडलेल्या प्रत्येक बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर सातारा जिल्ह्यात हे प्रमाण 99 टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यात आरबीएसकेच्या गटाने निवडलेल्या 33 बालकांसह 83 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. इंडियन आर्थोपेडिक असोसिएशननेही या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.