मुंबईकरांना गाजर दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई, 19 जानेवारी 2017 /AV News Bureau :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विविध घोषणा कराव्या लागत आहेत, याचाच अर्थ मनपा निवडणुकीत शिवसेना कमी पडत आहे. निव्वळ घोषणाबाजी करून मनपा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी आज सेना-भाजपवर टीका केली.

एकीकडे युती करण्यासाठी शिवसेना-भाजप चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते शिवसेनेच्या कारभाराला माफियाराज म्हणतात, मात्र अशाप्रकारे ते जनतेची दिशाभूल करू शकणार नाहीत, असेही तटकरे म्हणाले.

युती सरकार प्रत्येक गोष्टींमध्ये फेल ठरले आहे. गेल्या अडीच वर्षात या सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने हे सरकार आपल्या काही कामाचे नाही हे जनतेलाही आता कळले आहे, असे तटकरे यांनी सांगितले.