शेतकऱ्यांना 893 कोटींची नुकसान भरपाई

crop

राष्ट्रीय कृषि विमा योजनेअंतर्गत 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार

 मुंबई, 1 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

रब्बी हंगाम 2015-16 मधील आठ अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषि विमा योजनेंतर्गत राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 402 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे. बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

  • 26 लाख शेतकऱ्यांकडून विमा हप्त्यापोटी 56 कोटी 91 लाख जमा

रब्बी हंगाम 2015-16 मध्ये हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सुर्यफुल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमुग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित कण्यात आली होती. राज्यातील 34.26 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी 56 कोटी 91 लाख विमा हप्ता भरुन 24.60 लाख हेक्टर क्षेत्राकरिता 2865.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण  घेतले होते.

  • 88 लाख शेतकरी नुकसान भरपाईस पात्र

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या 26.88 लाख शेतकऱ्यांना 893.83 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकरी विमा हप्ता वजा जाता केंद्र शासनाचा हिस्सा. 408.92 कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा 408.92 कोटी रुपये अशी एकुण 817.84 कोटी  रुपये भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारतीय कृषि विमा कंपनीकडून एकत्रित नुकसान भरपाई 893.83 कोटी रुपयांची रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

विभागनिहाय नुकसान भरपाईची रक्कम

  • नाशिक विभाग – 32 लाख 22 हजार 923
  • पुणे विभाग – 107 कोटी 36 लाख 32 हजार 918
  • कोल्हापूर विभाग – 10 कोटी 28 लाख 53 हजार 542
  • औरंगाबाद विभाग – 340 कोटी 57 लाख 5 हजार 480
  • लातूर विभाग – 402 कोटी 84 लाख 87 हजार153
  • अमरावती विभाग – 31 कोटी 76 लाख 84 हजार 537
  • नागपूर विभाग – 66 लाख 76 हजार 627
  • एकुण लाभार्थी : 26 लाख 87 हजार 613 शेतकरी