सत्ता वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसमोर झुकली

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर

 मुंबई, 4 मार्च 2017 /AV News Bureau:

राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेत शिवसेनेसमोर नांगी टाकण्याचा भाजपचा निर्णय दुर्दैवी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले आहे. निवडणुकीनंतर हे दोन्ही मुंबई महापालिकेत पक्ष सत्तेसाठी एकत्र येतील, याबाबत निवडणुकीच्या प्रचारात आपण केलेले भाकीत खरे ठरल्याकडेही अहिर यांनी लक्ष वेधले आहे.

भाजपला मुंबईकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत, याचा अर्थ त्यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाची भुमिका पार पाडणे अपेक्षित असतानाही सत्तेत सहभागी होण्याचा भाजपचा निर्णय म्हणजे मुंबईकरांची फसवणुक असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीपुर्वी शिवसेनेचा कारभार म्हणजे “माफियाराज’असल्याचे म्हणणारा भाजप आता त्या माफियांच्या सत्तेतच सहभागी झाल्याचा टोलाही त्यांनी हाणला.भाजपच्या या निर्णयामुळे त्यांचा पारदर्शकतेच्या कारभाराचा आग्रह किती वरवरचा होता, हे उघड झाले आहे. तसेच भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचे आता काय होणार, याबाबतही भाजपने स्पष्टीकरण द्यावे असे आवाहनही अहिर यांनी केले.