मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई 4 मार्च 2017/AV News Bureau:

राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

सरकार वाचवण्यासाठी भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरल्याचा दावाही चव्हाण यांनी केला.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष असून मुंबई महापालिकेतून मिळणा-या टक्केवारीवर शिवसेना चालते, अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. मग आता निवडणूकीतून माघार घेऊन या माफिया, हप्तेखोर, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे, असे  चव्हाण म्हणाले.