भाजपाचे यश शिवाजी महाराजांच्या चरणी

cm at raigad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, 25फेब्रुवारी 2017/AV News Bureau:    

महापालिका व जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे यश आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सादर केले आहे. त्यांच्या आशिर्वादाने जनतेसाठी चांगले काम करून दाखविण्याची ऊर्जा घेऊन आलो आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार आणि अन्य उपस्थित होते.

 bjp leaders at raigad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर जाऊन छत्रपतींचा आशिर्वाद घेतला होता. विधानसभा निवडणुकीतही आपण शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेतला होता. महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर रायगडावर जाऊन शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेतला व आव्हानांचा सामना करण्यासाठी ऊर्जा घेऊन आलो. त्याच्या आधारे जनतेसाठी चांगले काम करून दाखवू, असे फडणवीस म्हणाले.

महापालिका निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून इतर सर्वांच्या नगरसेवकांच्या संख्येची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपाचे आहेत. जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. समाजाच्या सर्व घटकांनी भाजपावर विश्वास दाखविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पारदर्शी प्रामाणिक राजकारण सुरू केल्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला असून सर्वत्र भाजपाला यश मिळत आहे, असेही ते म्हणाले.