निवडणुकीतील यश हे मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

मुंबई,11 मार्च 2017/AV News Bureau:

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले ऐतिहासिक यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा भक्कम पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी व्यक्त केली.

२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर जिंकली होती. त्यावेळी सुरू झालेली भाजपाच्या यशाची मालिका चालूच असल्याचे शनिवारच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. गेली अडीच वर्षे मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे जनतेच्या पाठिंब्याचे मतांमध्ये रुपांतर झाल्याचेही दानवे म्हणाले.

जातीपातीचे राजकारण करून विकासाचा मुद्दा मागे ठेवणाऱ्यांना जनतेने मतदानातून उत्तर दिल्याचेही दानवे यांनी सांगितले.