भाजपाचे मूळ उद्दीष्ट कायम

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा विश्वास

मुंबई, 6 एप्रिल 2017/AV News Bureau:

भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या वेळी स्वप्नातही वाटले नव्हते असे यश भाजपाला आता मिळाले आहे. पंचायत ते पार्लमेंट सर्व निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर येऊन सत्ता मिळाली. मात्र सत्ता हे जनतेच्या सेवेचे साधन आहे या मूळ उद्दीष्टावर भाजपा कायमच असून त्याच दिशेने पक्ष वाटचाल करील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी गुरुवारी व्यक्त केला.

भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, प्रदेश सचिव उमा खापरे,मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण साठे व मुकुंदराव कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, गणेश हाके व शिरिष बोराळकर उपस्थित होते.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाखाली आपण काम करत असून भाजपाची यशाची चढती कमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीब हा देव मानून काम चालू ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी अखंड परिश्रम करून पक्षाचे काम वाढविले आहे असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.