4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, 5 जून 2017/AV News Bureau:

विकास होत असतानाच पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. शासनाने 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला असल्याचे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुख्य सचिव सुमित मल्लिक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन बलगन, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.

जल, जमीन आणि जंगलाला आपल्या पुर्वजांनी ईश्वराचा दर्जा दिला आहे. या तिन्ही गोष्टी नष्ट झाल्यातर कुणीही जगू शकणार नाही. पूर्वी गावा-गावात नदी-नाले, तलाव, छोटे बंधारे असायचे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नव्हता. अलिकडच्या काळात हे सर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आपण नष्ट केले. पाणलोटाचे नुकसान केले. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरु केली. त्यामुळे पाणीसाठा वाढला, शेकडो गावांना पाणी मिळाले. लातूर जिल्ह्यात आज एकही टँकर लागत नाही. हे जलयुक्त शिवारचे यश आहे. `माती, गाळ काढा आणि शेतात टाका` हा कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील 54 हजार तलावातील गाळ काढून शेतात टाकणार आहोत. त्यामुळे शेती सुपीक होऊन भरघोस उत्पादन वाढेल. उद्योगांनीही पर्यावरणपूरक उद्योग सुरु करावेत. कार्बन कमी करण्याच्या उपाययोजना करणं आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

पर्यावरण मंत्री कदम म्हणाले की, प्रदुषण हा जगभरात भेडसवणारा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षापासून वन विभागासोबत 50 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र ही मोहिम सुरु आहे. प्रत्येकाने किमान 10 झाडे लावून ती जगवली पाहिजे.

मुख्य सचिव मल्लिक यावेळी म्हणाले की, प्रत्येक गावाने पाण्याचे स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा प्रश्न सोडविला पाहिजे. शहरातून सोलर एनर्जीचा वापर वाढला पाहिजे. प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे.

प्रारंभी पर्यावरणावरील माहितीपट दाखविण्यात आला. डॉ.अनबलगन यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर पर्यावरणाचा संदेश असलेल्या एम.टी.एन.एल. च्या बिलाचे, हवा गुणवत्ता अहवाल पुस्तिकेचे, ब्रेन लिपीतील पर्यावरण पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वसुंधरा पुरस्कार-2017, पर्यावरण वसुंधरा लघु चित्रपट स्पर्धा विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. जलसंवर्धन केलेल्या गावांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यावरण पुरस्कारप्राप्त नागरीक, संस्थांचे प्रतिनिधी, अंध मुले, पर्यावरणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार वितरण

  • जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात पर्यावरणाचे संवर्धन करणा-या विविध संघटना आणि संस्थाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • वसुंधरा पुरस्कार 2017 चे प्रथम पारितोषिकाचे रेमंड युको डेनिम प्रा.लि. लेाहार, जिल्हा यवतमाळ हे मानकरी ठरले.
  • द्वितीय गॉडफ्रे फिलीप्स इंडिया लिमीटेड, नवी मुंबई आणि जॉन डिअर इंडिया प्रा.लि. पुणे हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि दिड लाख रोख प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
  • वृक्ष लागवड आणि संगोपनाकरीता विशेष गौरव म्हणून मे.पाल फॅशन प्रा.लि., एम.आय.डी.सी. बोईसर यांना 17 हजार वृक्ष लागवडीकरिता विशेष पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
  • वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा 2017 या स्पर्धेत हौशी गटातून प्रथम पारितोषिक ‘ॲन्ड द बर्डस स्टार्टेड चिर्पिंग अनेन’-इंडियन ग्रामिण सर्व्हिसेस, आणि द्वितीय पारितोषिक मिलींद रणदिवे यांचे ‘पश्चिमा’ तर एससीएम सोफिया कॉलेजचा ‘सेव द स्पॅरो’ या लघुचित्रपटास तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. अनुक्रमे एक लाख, 75 हजार आणि 50 हजार, प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • उत्कृष्ट दर्जाचे इसी पोर्टल विकसित केल्याबद्दल महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहायक यंत्रणा अधिकारी दिनेश सोनावणे, वेबवर्क्स इंडिया प्रा.लिमीटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर तुषार चोपडे, वेबवर्क्स इंडिया प्रा. लिमीटेडचे सिनीअर डेवलपर सयान पाल यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
  • महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व वनराई पुणे जलसंवर्धन पंचायत अंतर्गत नाशिक येथील मुळेगाव, जालना येथील बाजार वाहेगाव, रायगड येथील दांडगुरी या गावांचा गौरव करण्यात आला.