सरकारने सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही

राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 24 जून 2017/AV News Bureau:

सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु त्या शब्दाचे तंतोतंत पालन झालेले नाही. सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

गेली दोन वर्ष हे सरकार कर्जमाफीसाठी टाळाटाळ करीत होते. हा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला असता तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. आपले हे पाप लपविण्यासाठीच या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. थकित कर्जामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, सरकारने केवळ 40 लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला. सरकारचा हा निर्णय उर्वरित शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा आहे, असे विखे पाटील म्हणाले.

शिवसेनाही सर्वच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी करीत होती. त्यासाठी त्यांनी सरकारबाहेर पडण्याचीही वल्गना केली होती. तीच शिवसेना आता सरसकटऐवजी दीड लाखांच्या मर्यादेवर राजी कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने आणखी एकदा घुमजाव करून शेतकऱ्यांच्या हिताला हरताळ फासल्याचे विखे पाटील म्हणाले.