कापडी पिशव्या तयार करा

प्लास्टिक उद्योजकांना पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन

मुंबई, 19 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात तसेच कॅरीबॅग तयार करणा-या उद्योजकांनी कागदी पिशव्या तयार कराव्यात असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात केले.

प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्ट मंडळाने पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. प्लास्टिक उद्योजकांना त्यांचाकडील शिल्लक असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग, पिशव्या नष्ट करण्यासाठी निश्चितच काही कालावधी दिला जाईल. त्याचबरोबर कुठलेही प्लॅस्टिकचे उत्पादन, कॅरीबॅग निर्माण होणार नाहीत. याची काळजी घेतली पाहिजे. असे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.

प्लास्टिक उद्योजकांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याकडे दररोज ११०० टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे. भविष्यात आरोग्याचा मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्लास्टिक बंदीला पाठिंबा देऊन समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेक महिला बचतगटांनी कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या बनविणे सुरू केले आहेत. जे उद्योजक कॅरीबॅग तयार करायचे त्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याकडे वळले पाहिजे. त्यासाठी शासन नक्कीच मदत करेल. राज्यातील प्लास्टिक कारखान्यात काम करणारे जे कामगार असतील व प्लास्टिक बंदी मुळे बेरोजगार होणार असतील तर त्यांचा बाबतीतही योग्य निर्णय घेऊ. अशा कामगारांची यादी प्लास्टिक उद्योजकांनी द्यावी,  असेही कदम यांनी सांगितले.

एस.एम.एस. कंपनीने मुंबई सोडावी

दरम्यान मानखुर्द येथील एस.एम.एस. कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याबाबत या कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार अबू आझमी यांच्या शिष्ट मंडळाने पर्यावरण मंत्रांची भेट घेऊन प्रदूषणाबाबत चर्चा केली. यावेळी श्री. कदम म्हणाले, जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या या प्रकल्पाने मुंबई बाहेर प्रकल्प नेण्याचे निर्देश दिले. या प्रकपाच्या धुरा मुळे मानखुर्द भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावेळी कंपनीचे अधिकारी आणि मानखुर्द परिसरातील नागरिक उपस्थित होते.