राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख

राज्य शासनाकडून पदक विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर

अविरत वाटचाल न्यूज/ नवी मुंबई, ११ एप्रिल 2018:

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्यातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंस 30 लाख तर कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या खेळाडूंना घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात येणार असून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 12.50 लाख, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंच्या मार्गदर्शकास 7.50 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सर्व खेळाडूंना अभिनंदन केले असून या खेळाडूंसह यापुढेही पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

आतापर्यंत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात मधुरिका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे आणि सनिल शेट्टी यांनी तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात हीना सिद्धू यांनी 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि 10 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. या खेळाडूंचा तसेच या स्पर्धेत यानंतरही पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडू व मार्गदर्शकांचा अशा पद्धतीनेच गौरव करण्यात येणार आहे.