- लोकांचे दोस्त संघटनेतर्फे राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांची भेट
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 6 जून 2018:
निवडणुकीत ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान घेण्यात येते ते बॅलेट पेपरवर घेण्यात यावे या मागणीकरिता लोकांचे दोस्त संघटनेचे शिष्टमंडळ आज दुपारी 1 वाजता राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांना भेटले. यावेळेस निवडणुका पूर्वीसारख्याच बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या मागणीचे निवेदन चन्ने यांना देण्यात आले.
- आयोगाला देण्यात आलेल्या निवेदनात सध्या निवडणुकीत मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हीएम मतदान यंत्र मतदारांच्या विश्वासास पात्र ठरत नसून, या यंत्राबद्दल मतदारांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. या यंत्रात घोळ, बिघाड व यंत्र हैक होण्याच्या अनेक घटना निवडणूक काळात घडत असल्याचे म्हटले आहे. या सर्वप्रकारामुळे भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या मुलभूत अधिकारावरच गदा आली असून, आपण देत असलेले मत त्याच व्यक्तीला जात आहे कि, नाही याबाबतच मतदारांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. ज्या देशांनी सर्वप्रथम ईव्हीएम यंत्राची निर्मिती आणि वापर केला त्या देशांनी हे यंत्र सुरक्षित नसल्यामुळे त्याचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास सुरवात केली आहे. ईव्हीएम यंत्राबद्दल मतदारांच्या मनात अविश्वास व संशय निर्माण झालेला आहे. या पार्शभूमीवर अट्टहास करून ईव्हीएम यंत्रावरच निवडणुका घेतल्या गेल्या तर मोठा जनक्षोभ उसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- शेखर चन्ने यांनी आम्ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतो, त्यामुळे त्यासंदर्भात आम्ही आपल्या निवेदनाचा विचार करू. जर देशभराकरिता मागणी असेल तर ती केंद्रीय निवडणूक आयोगाला करा अशी सूचना करीत चन्ने यांनी निवेदनाचा स्वीकार केला. ‘लोकांचे दोस्त’ संघटनेचे प्रमुख रवी भिलाणे यांनी तातडीने केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांना भेटून निवेदन दिले असल्याचे सांगितले.
‘लोकांचे दोस्त’ संघटनेचे नेते रवी भिलाणे यांच्या नेतृत्वखाली भेटलेल्या शिष्टमंडळात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला, संजीवनी नांगरे, एम. ए. खालिद, दैवशाली गिरी, प्रतीक्षा मनुरे व मंगेश साळवे यांचा सहभाग होता.
इतर बातम्यांचाही मागेवा…
- न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिकं रोड
- स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ












