मुंबई- गोवा महामार्गावर आजपासून गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना वाहतूक बंदी

जीवनावश्यक वस्तूंची वाहूतूक करणाऱ्या वाहनांना सूट

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • रायगड, 8 सप्टेंबर 2021:

गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरून 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वाहनक्षमता असणा-या अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. ही बंदी चार टप्प्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. 08 सप्टेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून20 सप्टेंबर 2021 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाव्दारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते. मात्र गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये, यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म. क्र. जुना क्र.17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्ग पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/ रेती भरलेल्या ट्रकची मोठ्या ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत:-

8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर

08 सप्टेंबर 2021 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर  2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म. क्र. जुना क्र.17) वर सर्व वाहने ज्यांची वाहनक्षमता (Total Gross Weight) १६ टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड अवजड वाहने, ट्रक मल्टीएक्सल. ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

14 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर

14 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 8.00 वाजल्यापासून ते  15 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8  वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

19 ते 20 सप्टेंबर

19 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 8.00 वाजेपासून ते 20 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8  वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण/रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. या वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र दिले जाणार आहेत.

जे.एन.पी.टी. बंदरातून आयात निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील, याकरीता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे, असेही निर्देश शासनाने  जिल्हा प्रशासनाला दिले .

=================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप