अभियंत्यांनी काम करताना नवनिर्मिती, सर्जनशीलता वापर करतो का? याचा विचार करावा- आयुक्त अभिजीत बांगर

अभियंता दिनी महानगरपालिका मुख्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १६ ऑगस्ट २०२२

नवी मुंबईच्या नावलौकीकात अभियांत्रिकी विभागाचे महत्वाचे योगदान असून याचा अभिमान बाळगतानाच  नवनिर्मिती, सर्जनशीलता हा इंजिनिअरींग शब्दाचा खरा अर्थ असून आपण काम करताना या दृष्टीने करतो काय याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  व्यक्त केले. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या  यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येक अभियंत्याने वेगळेपण जपणारे काम करावे अशा शब्दात अभियंता दिनानिमित्त बांगर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित ‘अभियंता दिन’ समारंभात आयुक्त आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, समारंभाचे प्रमुख वक्ते राजेंद्र कुमार सराफ, माजी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शहर अभियंता संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेत आगामी नियोजित प्रकल्प व सुविधा कामे या विषयी विस्तृत माहिती दिली. कोव्हीड काळातील आपल्या कामाची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून तक्रार निवारणाच्या जलद कार्यवाहीची दखल आस्कीसारख्या मानांकित संस्थेकडून घेतली गेली आहे ही अभिमानाचा बाब असल्याचे सांगितले. स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पर्यावरण, यांत्रिकी, विद्युत, संगणक अशा विविध अभियांत्रिकी क्षेत्रात यापुढील काळात नागरिकांना समाधानकारक अशा दर्जेदार सुविधा पुरविण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम केले जात असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांना अभिप्रेत असलेली दैनंदिन कामांमध्ये आधुनिकता व नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंता राजेंद्र कुमार सराफ यांचे स्मार्ट इंजिनिअरिंग ऑफ बेटर वर्ल्ड या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उप अभियंता विवेक मुळे यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तसेच उप अभियंता विश्वकांत लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.