शासन आपल्या दारी”अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे  ःखा डॉ.श्रीकांत शिंदे

ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे 3 मार्च रोजी “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे होणार भव्य आयोजन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 28 फेब्रुवारी 2024

खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन खा.डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यात प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा मार्ग, कोळे, कल्याण येथे दि.3 मार्च 2024 रोजी “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमासाठी पूर्वनियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमोल शिंदे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर मा. मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक विकास आवटी, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त श्री. स्वामी, उपायुक्त पंकज शहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आणि विविध समित्यांचे नोडल अधिकारी, इतर संबंधित अधिकारी समिती सभागृहात उपस्थित होते.

सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत.या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू, असा विश्वास खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यांनी महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका, परिवहन, महामंडळे तसेच इतरही विभांगाना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागालाही सूचित केले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

========================================================


========================================================