10+2+3 अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल नाही

मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,29 मे 2017/AV News Bureau:

साधारणपणे शहराचा विकास आराखडा दर दहा वर्षांनी करण्यात येतो. त्याचप्रमाणे बदलत्या परिस्थितीनुसार आणि शिक्षणक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेवून ‍अभ्यासक्रमाचाही आढावा  दर पाच वर्षांनी घेणे आवश्यक आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या 10+2+3 अशा अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा,नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, ॲप्रेंटिशीप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी अशा विविध विषयांवर राज्यातील युवा पिढीशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसारित झालेल्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते.

महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने विकास करु शकतात. बिट्स पिलानी सारख्या संस्थांना स्वायत्त दर्जा असल्याने त्या संस्था विकास करु शकल्या. जगात जे चांगले आहे ते त्यांनी स्वीकारले. आपल्याकडे जोपर्यंत विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये बदल करीत नाही तोपर्यंत महाविद्यालयांना किंवा शैक्षणिक संस्थांना बदल करता येत नाही. सध्या तरी 10+2+3 अशा अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल करण्यात येणार नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अभ्यासाबरोबर खेळही महत्वाचा

ज्याप्रमाणे विद्यार्थी अभ्यासात चांगला असल्यास त्याचे उत्तम करीअर होऊ शकते; त्याचप्रमाणे खेळात चांगला असल्यास त्याचे खेळातही चांगले करीअर होऊ शकते. महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडावे यासाठी राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्वांसाठी शिक्षण या कायद्यानुसार शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना थेट नियुक्तीही देण्यात येते,असे मुख्यमत्र्यांनी सांगितले.

करीअर निवडीसाठी कलमापन चाचणी

कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपला कल कोणत्या शाखेकडे आहे, आपण कोणते करीअर निवडले पाहिजे हे विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होते. कलमापन चाचणीमुळे योग्य ते करीअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार असून आगामी काळात कलमापन चाचणी अधिकाधिक आधुनिक केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.