सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक रमेश हरळकर यांची खंत
संस्थेतर्फे पाचल पंचक्रोशीतील 500 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वाटप
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पाचल/हरळ,24 जून 2025
ग्रामीण भागात शिक्षण हे आजही मोठं आव्हान आहे. कारण दळणवळणासाठी पुरेशी साधनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. त्यातच कमी होणारी पटसंख्या ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणा-या विद्याथ्याना शैक्षणिक साहित्य पोहोचणं अत्यंत गरजेचे असते. ही बाब लक्षात घेवून गेली अनेक वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोफत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे काम करीत असल्याचे सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरळकर (rameshharalkar) यांनी सांगितले.

सफाई कामगार परिवर्तन संघ या संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हातील आणि राजापूर तालुक्यातील हरळ, पाचल, परुळे, ताम्हाणे, कारवली, मूर, जवळेधर, वाळवड, कार्जिडा,करक,पांगरी, रायपाटण आणि आजूबाजूच्या सुमारे ५०० शाळकरी विद्यार्थ्यांना 22 आणि 23 जून रोजी पाचल येथील स्वातंत्र्य सैनिक गोपाळ उर्फ आबा नारकर सभागृहात मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे आयोजित केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाला राजापूर अर्बन बँकेच्या संचालक प्रतिभा नारकर- रेडीज, सामाजिक कार्यकर्त्या शशीकला देवरूखकर, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर, पाचल विभागाचे केंद्र प्रमुख अनाजी मासये, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जाधव, मुंबई हॉटलचे संचालक संजय रायबागकर, प्रकाश कलमस्टे, शैलेश जंगम,अरविंद वरेकर, गणपत परुळेकर, यश कॉम्प्युटरचे संचालक प्रकाश सावंत, ज्येष्ठ समाजसेवक दनार्दन करककर, सुनिल ताम्हाणकर, जिजामाता विद्यामंदीरचे कुंभार सर, रायपाटण पोलीस ठाण्याचे रामदास पाटील,जनार्दन जाधव, वाळवड गावचे ज्येष्ठ समाजसेवक नरेश कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

रमेश हरळकर यांनी पुढे सांगितले की, आमची संस्था केवळ मुंबईसारख्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातील महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करीत असते. आमच्या या सामाजिक उपक्रमाला समाजातील असंख्य मान्यवर जमेल तशी मदत करीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहकार्याचा हात देणे शक्य होते. आमच्या कार्याची दखल घेत अनेकांनी या उपक्रमाशी स्वतःला जोडून घेण्याचा मनोदय व्यक्त केल्याचेही हरळकर यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बॅंकेच्या संचालक प्रतिभा नारकर- रेडीज यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पैसे बचतीची सुरूवात ही लहान वयातच होणं आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना बचतीची सवय लावावी. बॅंकेच्या माध्यमातून विविध योजना नेहमीच राबविण्यात येत असतात. त्यांची किमान तोंडओळख तरी मुलांना व्हावी यासाठी बॅंकेच्या वातावरणाची ओळख मुलांना करून देणे आवश्यक असल्याचे मत प्रतिभा नारकर रेडीज यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शशी देवरुखकर यांनी सांगितले की, आजच्या मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. मुलांना या मोबाईल पासून लांब ठेवून मैदानी खेळाकडे वळवता येणे गरजेचे आहे. पाचल विभागाचा निकाल हा नेहमीच चांगला लागत आला आहे त्यामुळे हीच परंपरा पुढे न्यायचीअसेल तर विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि अशा होतकरू मुलांना रमेश हरळकर सरांसारखे मदतीचे हात पुढे करतात, ही आनंदाची बाब असल्याचे शशी देवरूखकर यांनी सांगितले.

आयुष्यात कितीही यशाच्या शिखरावर पोहोचलात तरीही तुमचे पाय जमिनीवर ठेवा आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो याचा विचार करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जाधव यांनी केले.
मासये गुरूजी यांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेत एआय आणि त्याचा वापर यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणासोबतच बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून मुलांनी पुढील वाटचाल करावी, असे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील मुलांसाठी सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे करण्यात येणा-या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्याचे भाग्य लाभले. यापुढेही गावागावात जावून गरजू मुलांना शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

हरळ गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गावच्या सरपंच माधवी मंगेश पांचाळ, माजी संरपंच मंगेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिता अजित तांबे, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत शिंदे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग आणि १०० हून विद्यार्थी उपस्थित होते.
सफाई कामगार परिवर्तन संघ या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापूर चालुक्यातील पाचल पंचक्रोशीतील साडेतीनशेहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेली पन्नास वर्षे सफाई कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करणा-या सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच दुर्गम भागात राहणा-या विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप केले जाते.
========================================================
















