- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 19 ऑगस्ट 2025
मोसमी पावसाने आपला रुद्रावतार दाखवला असून गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून आणखीन भिषण रुप धारण केले आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी तुंबले असून रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात अडकून पडल्याचे दिसून येते आहे.
सकाळी साडेआठ ते साडेअकरा या तीन तासांत 36 पूर्णांक 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस वाशी विभागात नोंदला गेला असून तिथे 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान ऐरोली, दिघा, घणसोली, रबाळे, तुर्भे विभागातल्या सखल भागात पाणी साचलं आहे. दिघा भागातल्या नामदेव नगर इथं असलेला नाला भरून वाहत असून जवळपास 15 रहिवाशांच्या घरात पाणी शिरू लागलं आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर मुकुंद ब्रिज खाली, मुकुंद कंपनीच्या समोर पाणी साचलं आहे. याच मार्गावरील कोपरखैरणे इथल्या भारत बिजली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात, घणसोली रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचलं असून महापालिकेच्या वतीने पाणी उपसा पंप सुरू करण्यात आले आहेत. तुर्भे विभागातील इंदिरानगर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाणी साचलं असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
आज 19 ऑगस्ट ठाणे जिल्ह्याला पर्जन्यवृष्टीचा रेड अलर्ट असून संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महापालिका यंत्रणा सर्व विभागांमध्ये अलर्ट मोडवर कार्यरत आहे. नागरिकांनी अत्यंत गरज असलेल्या कामासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत असून घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या विभाग कार्यालयाची अथवा मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन आहे











