- सिद्धार्थ हरळकर/अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 23 डिसेंबर 2025
गेली अनेक वर्षे लांबलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या खोळंबलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये इतर शहरांप्रमाणे नवी मुंबई शहरात मागच्या खेपेला उमेदवारीने हुलकावणी दिलेल्या इच्छुकांच्या इच्छा आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. तर नव्याने राजकीय वाटचाल सुरु करणाऱ्या नवोदीतांनाही मोठी संधी असल्यामुळे तरुण कार्यकर्तेही उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत उतरले आहेत.
मात्र गेली अनेक टर्म नगरसेवकाच्या खुर्चीत बसलेले ज्येष्ठांना स्वतः बाजूला होवून नव्या रक्ताला संधी देण्याची इच्छ होत नसल्यामुळे गेली अनेक वर्षे पक्षासाठी इमाने इतबारे काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या नशिबी यावेळी झेंडाच हाती घेण्याची पाळी येण्याची दाट शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपवासी झालेल्या माजी नगरसेवकांची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये कित्येक माजी नगरसेवकांनी ३ ते ४ किंवा त्यापेक्षा अधिक काळ श्रीमंत मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून ठाण मांडलेले आहे. नगरसेवक म्हणून होणारे फायदे पाहता ही मंडळी सहजासहजी पायउतार होणार नाहीत याबाबत दुमत नाही. तसेच आपला विजय निश्चित व्हावा यासाठी पक्ष बदलण्याचा सपाटाही अनेकांनी लावलेला आहे.
त्यामुळे जोपर्यंत ही ज्येष्ठ मंडळी स्वच्छेने आपल्या जागा सोडत नाहीत, तोपर्यंत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पक्ष निष्ठा वा नेता निष्ठा दाखवण्याऐवजी माझे पुनर्वसन कसे होणार या भूमिकेतून वेगळ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या काही काळात महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे संवेदनशील बनले आहे. पक्ष फुटी, पक्षांतर आदी कारणांमुळे राजकीय महत्वकांक्षा असलेल्या अनेकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे पक्ष बदलले आहेत. राजकारणात संधीला अत्यंत महत्व असते ही बाब आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे. त्यामुळे दादा, ताई, माई, अक्का या घोषणेपेक्षा तरुण कार्यकर्त्यांमध्ये स्वयंविकासाचे धुमारे यावेळी मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे.
र दुसरीकडे संभाव्य धोके लक्षात घेता आता ज्येष्ठांनाही आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्यांची निष्ठा टिकवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे. कारण आपल्यावर अन्याय होत असेल ही भावना जर तरुण कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहीली तर त्यांचा स्वः हिताला प्राधान्य देण्याकडे कल असेल, ही बाब ज्येष्ठांच्याही लक्षात असणार आहे, त्यामुळे स्वतः ची जागा राखण्याबरोबरच कोणताही दगाफटका होवू नये यासाठी ज्येष्ठ सावधपणे पावले टाकतील.
गेल्या काही वर्षांत महापालिका निवडणूक, नगरसेवक, राजकीय आणि आर्थिक गणिते यांची सांगड अधिक घट्ट झालेली दिसते. त्यामुळे या समिकरणात स्वतःला बसविण्यासाठी अनेक इच्छुक गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करीत आहेत. अशावेळी आपल्या आवडत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षात उडी मारण्याची खेळी ही मंडळी करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत आणि तसे घडले तर हे सगळ्या पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील सत्ताधारी युतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सामिल होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र दुसऱ्या पक्षातील इनकमिंगमुळे आधीपासूनच पक्षात असलेल्यांची चिंता वाढू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे.
राज्यातील पक्षीय राजकारण बदलल्यानंतर त्याचे दिर्घकालीन परिणाम सर्वच पक्षांवर झालेले आहेत. पक्ष फुटीच्या घटनानंतर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेस काहीसे अस्वस्थ असल्याचे दिसून येते. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उबाठा, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस या आघाडीसोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिनही जोडले गेले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राजकारणाची दिशा बदलेल का, याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
यापार्श्वभूमीवर आघाडीच्या पक्षांमध्ये नाराजांना तसेच नवख्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ विरुद्ध तरुण नवखे हा वाद लवकर निकाली काढण्यावर सगळ्यांचा भर असेल, हे नक्की.
========================================================















