शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नवी मुंबई, 4 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. मात्र शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत जीव देवू नका तर न्याय मिळविण्यासाठी आंदोलन तीव्र करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेल येथे केले. जे राज्यकर्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत, त्यांचे जगणे असह्य करू, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा आयोजित केली होती. या संघर्ष यात्रेचा समारोप आज पनवेल येथे झाला. यावेळी आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनमोहन सिंह सरकारने परिस्थिती पाहून शेतकऱ्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतले होते. मात्र आताचे केंद्रातील मोदी सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. सरकारला तीन वर्षे होत आली तरी अद्याप एकाही निर्णयाची अमलबजावणी झालेली नाही. राज्यातही फडणवीस सरकार शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देत आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळायची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे कर्जाने पिचलेला शेतकरी आपला इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सर्वच नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली. काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरले. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्याच सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला हा निर्णय घेण्यास का चालढकल करीत आहे, असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला केला आहे.












