कंत्राटी कामगारांच्या समस्यांसाठी समिती

 

ऊर्जामंत्री बावनकुळे यांची घोषणा

मुंबई,22 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

ऊर्जा विभागातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीच्या संचालिका अनुराधा भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

कंत्राटी कामगारांच्या समस्यांसाठी कामगार संघटनांमार्फत प्रकाशगढ मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत वरील समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये सुमारे 35 हजार कंत्राटी कामगार आहेत. ही समिती 6 मार्च पर्यंत आपला अहवाल देणार आहे. या संदर्भात निर्णय घेत असताना समान वेतन कायद्याबाबत सर्वेाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

समान वेतन कायदा हा सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लवकरच कंत्राटी कामगारांना हा नियम लागू केला जाईल अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिली. नव्याने गठित करण्यात येणाऱ्या समितीमध्ये तीनही कंपन्यांचे कार्याकारी संचालक(मानव संसाधन) व संचालक (वित्त) यांचा समावेश असेल तसेच रानडे समितीचे सदस्यही या समितीत असतील. सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करणे, कंत्राटी कामगारां विषयी आकृतीबंद साचा तायार करणे व समान वेतन कायदा नियम लागू केल्यानंतर  सरकारी तिजोरीवर किती आर्थिक बोझा पडेल याचा आढावा ही समिती घेणार आहे. या समितीची पहिली बैठक 10 जानेवारी ला होणार आहे.