महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पुरस्कार’ 

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2017/AV News Bureau:

नागरिकांच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील 36 व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2016’  जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्रातील गोविंद  लक्ष्मण तुपे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’जाहीर झाले आहे, तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि निलकांत रमेश हरिकांत्रा यांना जाहीर झाला आहे.

देशातील 36 नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील 7 व्यक्तींना हे पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाले आहेत. ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 5 व्यक्तींना जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 8 जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 23 जणांना जाहीर झाले आहेत.

पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार रक्कम असे आहे.