झेडपीमध्ये राष्ट्रवादीशी आघाडीस अनुकूल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

 मुंबई, 24 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी गांधी भवन येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.

जिल्हा परिषदेत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. २५ पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.

  • मुंबई महापालिकेबाबत वेट अँड वॉच

शिवसेना-भाजप मित्रपक्ष असून, केंद्रात व राज्यात ते एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपकडे बहुमताइतके संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबई मनपात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करायची की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. या संदर्भात काँग्रेसची भूमिका त्रयस्थाची असून, काँग्रेस या परिस्थितीकडे ‘वेट अँड वॉच’नुसार केवळ ‘वॉच’ करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला खा. अशोक चव्हाणांसह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आदी नेते उपस्थित होते.