रायगड किल्याच्या संवर्धनासाठी ६०० कोटी

cm-nitin gadkari

केंद्राकडून तत्वत: मंजुरी  मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली,२८ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणा-या रायगड किल्याच्या संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनाने आखलेल्या ६०० कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्राकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली. रायगडसह राज्यातील शिवकालीन गड-किल्यांच्या संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

रायगडसह राज्यातील गड-किल्ले व प्रसिध्द गुहांच्या संवर्धन व सौंदर्यीकरण कार्यात येणा-या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आज केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेत परिवहन भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

  • रायगड संवर्धनांतर्गत करावयाच्या गोष्टी

रायगड किल्याचे संवर्धन आणि किल्यावर पर्यटक व शिवप्रेमींसाठी आवश्यक असणा-या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने सविस्तर आरखडा तयार केला. या आरखडयाचे सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आले. यात रायगड किल्यावरील चित्ता दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्दा बुर्ज , महादरावाजा आदींचे संवर्धन व जिर्णोध्दार करणे. तसेच, पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे. पाचड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोध्दाराचे कार्य तथा याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनाने आखलेल्या आराखडयाचे सादरीकरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हयातील सिंधुदुर्ग किल्ला(मालवण किल्ला), रायगड जिल्हयातील एलिफंटा द्विप, विदर्भातील बुध्दीष्ट सर्कीट विकास कार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

  • किल्ले, गुफांच्या संवर्धनाला प्राधान्य

राज्यात एकूण ३३६ गड- किल्ले असून ४० पेक्षा जास्त गड-किल्ले हे केंद्रशासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अख्त्यारीत येतात. यातील १८ किल्यांच्या संवर्धन व जिर्णोध्दाराचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. गड किल्यांसह राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंजिठा, वेरुळ आणि एलिफंटा गुंफाच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आवश्यक मदत पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी याबैठकीत सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले