विजयाचा अहंकार नको

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

चिंचवड, 26 एप्रिल 2017 /AV News Bureau:

भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कामामुळे देश आणि महाराष्ट्र बदलत आहे. भाजपाला मत दिल्यास आपला विकास होईल, या भावनेने लोकांनी जात,पात,पंथ,धर्म यापलीकडे जाऊन पक्षाला मतदान केले. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकातील भाजपाच्या जबरदस्त विजयामुळे अहंकार येऊ देऊ नये तर जनतेच्या सेवेचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी चिंचवड येथे केले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाच्या राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेशसिंह, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीश, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

भाजपाला राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले. राज्यातल्या भाजपाच्या यशामुळे संपूर्ण देशभर भाजपा कार्यकर्त्यांना आनंद झाला. विजयाचा आनंद साजरा करताना ज्या जुन्या असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रम व बलिदानामुळे पक्षाला हे आजचे चांगले दिवस आले त्या जुन्या कार्यकर्त्यांना विसरता कामा नये,असे गडकरी म्हणाले.

  • काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकऱ्याचे शोषण केले

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. पण इतकी वर्षे सत्तेवर असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शोषण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना भाजपा सरकार जबाबदार नाही. राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात उणे असलेला शेतीचा विकास दर आता साडेबारा टक्क्यांवर गेला आहे,असेही गडकरी म्हणाले.