महावितरणला आयएसजीएफ पुरस्कार

इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

 मुंबई, 14 मार्च 2017/AV News Bureau:

 भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा आर-एपीडीआपी  भाग-अ हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिली असून वितरण हानी कमी करण्यातही मोठे यश मिळविले आहे. याची दखल घेत इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमने महावितरणचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा आयएसजीएफ इनोव्हेशन अवॉर्ड-2017 ने गौरव केला आहे. केंद्र सरकारचे माजी ऊर्जा सचिव पी. उमाशंकर, ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार अशोक झुनझुनवाला व पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.के. गोयल यांच्या निवड समितीने महावितरणची आयएसजीएफ ऍ़वार्डसाठी निवड केली. महावितरणच्यावतीने कार्यकारी संचालक शंकर शिंदे यांनी दिल्ली येथे नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.

आर-एपीडीआपी  भाग-अ हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील सर्व राज्यात तो राबविण्यात आला आहे. यात देशभरातील विविध वितरण कंपन्यांपैकी सर्वात्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

महावितरणने केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील 128 शहरे गो-लाईव्ह (ऑनलाईनने जोडलेली) जाहीर करण्यात आली आहेत. तसेच यामुळे राज्याच्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक शहरातील वाणिज्यिक व वितरण हानी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. यामुळे अधिकाधिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी विद्युत  नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत देण्यात आली आहे.  तसेच ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या संख्येत निर्धारित मुदतीत सोडविण्यात यश येत आहे.

 दररोज 10 हजारपेक्षा अधिक ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात यश

गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांनी सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन व्यवहार केले.  त्याद्वारे ग्राहकांनी 4.9 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भांडुप आणि पुणे येथे अत्याधुनिक ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याद्वारे दररोज सुमारे 10 हजारपेक्षा अधिक ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात येतात.