संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक

मुंबई,14 एप्रिल 2017/AV News Bureau:

शेतकरी कर्जमाफीबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. बुलडाणा जिल्हयातील राजमाता जिजाऊंचे  जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून या संघर्ष यात्रेला सुरूवात होणार आहे. बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करीत शेवटी 18 एप्रिल रोजी शहापूर येथे दुस-या टप्प्यातील संघर्ष यात्रेचा समारोप कऱण्यात येणार आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,  जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षातर्फे कळविण्यात आले आहे.