तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करा

दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई, 2 मे 2017/AV News Bureau:

तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या पाच ते सहा दिवसांत अतिरिक्त यंत्रणा राबवून आणि दोन पाळ्यांमध्ये (Shift)काम करून उर्वरित तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिले.

राज्यातील तुरीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.खरेदी केंद्रांवर उर्वरितनोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू असून ती येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित तूरही तातडीने खरेदी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये 11 केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागातील पर्यवेक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारदाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे तसेच साठवणुकीसाठी खासगी गोदामे अधिग्रहण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.