सरसकट कर्जमाफी शिवाय पर्याय नाही

काँग्रेस आपली भूमिका सरकारला कळवणार

मुंबई 14 जून 2017/AV News Bureau:

तत्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतक-यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट करीत यासंबंधातली काँग्रेस पक्ष आपली भूमिका लवकरच सरकारला लेखी कळवेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अटी व शर्ती घालून अनेक शेतक-यांना वगळण्याचा घाट सरकारने घातला आहे. कर्जमाफीसाठी जमीनीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतक-यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जमीन क्षेत्राची मर्यादा घातली तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील,अशी भिती चव्हाण यांनी व्यक्त केली.

  • तत्काळ नवीन कर्जमाफीबाबत शासन निर्णय काढावा

अल्पभूधारक शेतक-यांची कर्जमाफी झाली असून त्यांना तत्काळ नवीन कर्ज मिळेल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र यासंदर्भात सरकारने शासन निर्णय काढला नाही, बँकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतक-यांनी बँकेमध्ये जाऊन नविन कर्जाबाबत विचारणा केली. मात्र बँकेने आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ सर्व शेतक-यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन शेतक-यांना तात्काळ नविन कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत. पेरणीसाठी शेतक-यांना 10 हजार रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्या संबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. सरकारने सरसकट  10 हजार रूपये देण्यापेक्षा शेतक-यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी असे चव्हाण म्हणाले.

या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, रोहिदास पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.