चंद्रपूर व बल्लारपूर ‘हरित रेल्वे स्थानके’ होणार

देशातील पहिली हरीत रेल्वे स्थानके होण्याचा मान मिळणार

मुंबई, 15 जून 2017/AV News Bureau:

चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील पहिली हरित रेल्वे स्थानके ठरणार असल्याची माहिती अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती व पर्यटन वाढीच्या दृष्टीने व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकाच्या खुल्या जागेवर शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर यांना ताडोबाच्या धर्तीवर चित्र रंगविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून वन आणि वन्यजीव यांचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच अधिष्ठाता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांनी या संदर्भात सादर केलेल्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता देण्यात आली आहे. या शासकीय संस्थेच्या माध्यमातून तसेच कला संचालनालयाच्या माध्यमातून ही दोन्ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येतील.