मुंबई विद्यापीठ परिक्षांचे निकाल 30 जुलै पर्यंत

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई. 26 जुलै 2017/AV News Bureau:

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एकूण 477 परिक्षांच्या निकालापैकी 104 परिक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केले आहेत. तसेच उर्वरित परिक्षांचे निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य शरद रणपिसे, यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर तावडे यांनी उत्तर दिले.

कला, वाणिज्य, विधी आणि व्यवस्थापन विभागाच्या अशा 70 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत.  उर्वरीत उत्तर पत्रिका तपासून 30 जुलैच्या आत या विभागांचा निकाल लावण्यात येणार आहे. हे काम जलद गतीने पुर्ण होण्यासाठी पेपर तपासणीसांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पेपर तपासण्यासाठी मदत घेण्यात येत असल्याचे तावडे यांनी सांगितले.

ऑनलाइन उत्तर पत्रिका तपासणीचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे निकाल वेळत जाहीर होण्यासाठी आणि निकाल जाहिर केल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

उशिरा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका फेरतपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि  उत्तरपत्रिका तपासताना  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये कोणताही  भेदभाव केला जाणार नाही असे तावडे यांनी सांगितले.