काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खातमा

जम्मू, 7 ऑगस्ट 2017:

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील लढाई अधिक तीव्र केली आहे. आज काश्मीरमधील माचिल सेक्टरमध्ये सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांकडून शस्रास्रे जप्त केली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलिकडून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार होत आहेत. यापार्श्वभूमीवर भीरतीय सीमा सुरक्षा दलाने व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जवानांनी व्यापक कारवाया करीत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

9 जून रोजीही उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खातमा केला होता. गेल्या सात महिन्यांत जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी सुमारे 125 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. 1 ऑगस्ट रोजीही पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात सुरक्षा जवानांनी लष्करच्या अबू दुजानाला मारले होते.

दरम्यान, सीमेपलिकडून सातत्याने होणाऱ्या दहशतवाद्यांचा घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारतीय सैन्याने व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे.