कोविड काळात महिला स्वयंसेवा समूहांमार्फत ३९.४६ कोटींची उलाढाल

१८ हजार १४८ महिलांनी घेतले ऑनलाईन प्रशिक्षण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 ऑक्टोबर 2020:

कोविड १९ चा प्रदूर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला  स्वयंसहाय्यता समुहामार्फत ३९.४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या काळात १८ हजार १४८ महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ८ हजार ४४४ स्वयंसहाय्यता संघांच्या माध्यमातून १ कोटी मास्कच्या निर्मितीतून ११.२६ कोटी रुपयांची,  २०.३८ मॅट्रीक टन फळे विक्रीच्या माध्यमातून ४.७ कोटी रुपयांची, २० हजार ९५९ मॅट्रीक टन भाजीपाला विक्रीतून १९. ४३ कोटी रुपयांची आणि ३ हजार ७३५ मॅट्रीक टन धान्य विक्रीतून ४.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. अशी सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य, राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केली. आज नवी मुंबई येथे सिडको भवनातील राज्य अभियान व्यवस्थापन कक्षात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी,  महाराष्ट्र राज्य गामीण जीवनोन्नती अभियान आर विमला, अतिरिक्त संचालक मानसी बोरकर, अव्वर सचिव चंद्रमणी खंदारे, उपसंचालक दादाभाऊ गुंजळ, राजेश जोगदंड, अश्विनी भोसले व इतर अधिकारी उपस्थित होते.

 महिलांचे स्वयंसहाय्यता समूह प्रभाविपणे कार्य करीत आहेत. या माध्यमातून सामाजिक समावेशण आणि संस्थांची बांधणी होत आहे. या अभियानांतर्गत आता पर्यंत ४ हजार १७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या असून, आगामी काळात अजून ४ हजार २२४ ग्रामपंचायती सहभागी होतील.  यासाठी प्रभावी प्रशिक्षण सुविधा देखील राबविण्यात येत आहेत.  उमेद अभियानांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये १ लाख ९६ हजार ७११ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य गामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुमतीवाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना, उपजिविका वृध्दीसाठी शेती व बिगरशेती आधारीत उपक्रम, महालक्ष्मी सरस, महिला किसान सशक्तीकरण परियोजना, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, कृतीसंगम अन्न, आरोग्य, पोषण व स्वच्छता अस्मिता योजना, दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांसद आदर्श ग्राम योजना अशा महत्त्वाच्या योजनांचा आढावा सत्तार यांनी  घेतला.