जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कठीण प्रसंगांवर मात करता आली

माजी ठाणे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, १२ ऑक्टोबर २०२२

ठाणे जिल्ह्यात गेली चार वर्षे काम करताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक कठीण प्रसंगावर मात करता आली, अश्या भावना ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा स्वागत सोहळा आज गडकरी रंगायतन येथे झाला. यावेळी सीमा नार्वेकर, स्मिता शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष वैदेही रानडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे वडील अंबादास शिनगारे यांचा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

नार्वेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनेक चांगल्या वाईट प्रसंग आले. परंतु जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या कर्तव्य पारायणता, नि:स्वार्थी भावनेने केलेल्या कामामुळे त्यावर मात करता आली. महालक्ष्मी एक्सप्रेसवरील आपत्ती, कोविड काळातील प्रसंग किंवा निवडणूक काळात केलेले काम असो या सर्व काळात सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्याचे नाव राखले गेले आहे. जिल्हाधिकारी असलो तरी सहकाऱ्यांकडे माणूस म्हणून पाहण्याची भूमिका नेहमी ठेवली आहे. त्यामुळेच  प्रशासनाचे भरभरून प्रेम मिळाले,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोविड काळात ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्या उत्तम काम व मेहनतीमुळे रेमडेसीविर वाटप किंवा  मजुरांना रेल्वेने मूळ गावी पाठविण्यासाठी केलेले नियोजनाचा पॅटर्न देशभर पोचला, असेही  नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

नवनियुक्त जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, राजेश नार्वेकर यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वामुळेच कोविड काळातही ठाणे जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य करून अग्रभागी राहिला. मुंबईच्या जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात काम करण्याचे मोठे आव्हान नार्वेकर यांनी आपल्या शांत, सुस्वभावी, निग्रही व संयमी स्वभावाने लिलया पेलले आहे. त्यांनी आपल्या कृतीतून आव्हानांना उत्तर दिले. जिल्हाधिकारी पदाची विश्वासहर्ता वाढविण्याचे काम त्यांनी केले. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी पदावर काम करण्याचे माझ्या समोर मोठे आव्हान आहे.

यावेळी श्रीमती रानडे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अपर जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. मनीष रेंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, तहसीलदार सर्वश्री जयराज देशमुख, तहसीलदार प्रशांती माने, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, अमोल जाधव, गिरीश काळे, सुनील धगळे, गंगाधर आयरे, ऋषिकेश कुलकर्णी यांनी यावेळी  नार्वेकर व  शिनगारे यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांनी आभार मानले तर पंकज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.